✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
कळवे ते जोहे रस्त्यात ॲक्सिस बँक समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम उपविभाग पेण प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केला आहे.
गेली अनेक वर्षे कळवे येथील ॲक्सिस बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग नसल्याने चार गावांचा संपर्क तुटत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहे, वयोवृद्ध नागरिक जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढीत असतात या वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज करून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळवे जोहे आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी पाण्यात उतरून रास्ता रोको केला आहे.
यावेळी अलिबाग येथील अडिशनल एसपी (अतिरिक्त पोलीस अधीक्षक) अभिजीत शिवथारे, डीवायएसपी जालिंदर नालकुल, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्रम्हाणे, तहसीलदार तानाजी शेजाळ, माझ्या तहसीलदार प्रसाद कालेकर, पीडब्ल्यूडी पेण बांधकाम अधिकारी डी एम पाटील तसेच कळवे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता नैसर्गिक नाळे मोकळे करून ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते बाजूला करण्याचे आदेश दिले.
या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.