गडब/सुरेश म्हात्रे
रायगडात मनसेला खिंडार पाडणे अशक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. नुकतेच रुपेश पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर टीका करताना जितेंद्र पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.
रुपेश पाटील यांनी भाड्याने माणसे आणून पक्षप्रवेश करविला, असा टोलाही लगावला. जितेंद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून मी मनसे पक्ष सोडला असल्याचे सांगताना रुपेश पाटील यांनी मनसे नेतृत्वावर टीकाही केली होती. त्याचा समाचार घेताना जितेंद्र पाटील म्हणाले की,
मनसेतून दोन पाच गेले
तरी काही फरक पडत नसल्याचे सांगितले. मनसेला खिंडार पडणारा अजून जन्माला आला नाही. आता त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असा सल्लाही दिला. स्वतः तालुका
अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत कधी एवढे कार्यकर्ते फिरत नव्हते, मग पक्ष प्रवेशावेळी एवढी माणसे आणली कुठून की फक्त भाड्याने व जेवणासाठी आणली होती असा टोलाही लगावला.
एवढेच नव्हे तर पेण पालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून, सत्ताधाऱ्यांची घराणेशाहीच पालिका चालवत आहे, त्याला पूर्णविराम दिला पाहिजे. येत्या नगरपालिका निवडणुकीत पेण मधून १५ उमेदवार लढणार असल्याचे जाहीर करत भाजपला देखील जितेंद्र
पाटील यांनी टार्गेट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश येतील तेव्हा जशाच तसे उत्तर दिले जाईल, ज्याला पक्षाने शून्यातून उभा केला आणि तालुका अध्यक्ष बनवला तो पक्ष सोडल्यावर टीका करायला लागला. आम्ही त्यावेळी एकाच घरात महत्वाची तीन पदे देऊन चूक केली असे ते म्हणाले. येत्या दोन महिन्यात पेण तालुक्यात ५०० जणांचा मनसेत प्रवेश करणार आहोत. मनसेने पेण मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. आम्ही लवकरच पेणमध्ये आणखी दहा शाखा उघडणार असून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पेण मध्ये लवकरच १ लाख रूपये बक्षीस असलेले कबड्डीचे सामने आयोजित करणार असल्याचे जितेंद्र पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष संदीप ठाकुर, जिल्हा महीला अध्यक्षा सपना देशमुख, शहर अध्यक्ष सुदेश संसारे आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.