*⭕गडब/अवंतिका म्हात्रे⭕*
रायगड जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थीकडे उत्तेजक द्रव्य आढळल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिघाजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या रक्ताची तपासणी केली जाणार आहे. त्यात दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश दिले आहेत.याबाबतचे वृत्त असे, सध्या अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १९ हजार परीक्षार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. पोलीस यंत्रणेच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरु आहे. याच चाचणीसाठी आलेल्या तिघाजणांकडे उत्तेजक द्रव्य असल्याची पक्की खबर अलिबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस स्टाफला गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार वरसोली, नाईक आळी येथील अजय अरूण तिवरेकर यांच्या मालकीच्या कॉटेजमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता तेथे उतरलेल्या एकाकडे एक ग्रे रंगाचे चेन लावलेले पाऊच मिळुन आले. त्यामध्ये दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, नाव नमुद नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू ४० इन्सुलिन असे नाव असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले अशा प्रकारचे साहित्य मिळुन आलेले आहे.
सदरच्या औषधीद्रव्य व गोळयांबाबत वाघांदरी, ता. श्रीगोंदा येथून आलेल्या युवकाकडे विचारणा केली असता त्याने मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळया व औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीमध्ये होतो असे सांगितले. याप्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या शिक्रापूर आणि शिरुर येथील दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आलेले आहे.
सदर घटनेची चौकशी अलिबाग पोलीस ठाणे करीत असून चौकशीमध्ये पुरावे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदरच्या औषधीद्रव्य व गोळयांचा वापर मैदानी चाचणीच्या पुर्वी केला जात असल्याने सदरचे साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडुन रक्ताचे नमुने काढुन घेण्यात आलेले आहेत. ते रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडुन देण्यात आलेले असुन त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामधील निष्कर्षावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापैकी शिक्रापूर आणि शिरुर येथून आलेल्या युवकांची मैदानी चाचणी यापूर्वीच झालेली आहे
उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तु / पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळून येतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केली आहे.


