गडब/सुरेश म्हात्रे
“पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून सुनील तटकरे यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
“आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच मोहम्मद फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षासाठी न्याय मागतोय, महिला विधेयक मांडत असताना सभागृहात त्यांची उपस्थिती नव्हती. सुनील तटकरे यांच्या विरोधात पक्षविरोधी कृतीची याचिका करुन आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे.
मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही”, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच “यावरील कार्यवाही इतक्या कालावधीपासून प्रलंबित आहे, कार्यवाही केली जात नाही, यामुळे शेड्युल (सूची) दहाचे उल्लंघन होत आहे”, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.
“अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसर्यांच्या जीवावर चाललेले आहे. मी डेटानुसार सांगू शकते की, अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे, त्यांच्यासारखे केवळ आरोप करुन मी थांबणार नाही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“सुप्रीम कोर्ट स्पीकरच्या कामावर प्रचंड आश्चर्य आणि नाराजी व्यक्त करत आहे. देश नियम आणि कायद्याने चालतो, अदृश्य शक्तींनी चालत नाही. हा देश संविधानांनी चालला पाहिजे. चालत नसेल तर आम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण न्याय मिळालाच पाहिजे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.